महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ९ जुलै २०२५ रोजी दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या काही बड्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. […]
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ही भेट गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले. मात्र अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा उच्चस्तरीय भेटीगाठी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात. त्यात सध्या राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे वातावरण आहे. महाविकास आघाडीतील कुरबुरी, आगामी निवडणुका, ठाकरे बंधू आणि विविध पक्षांमधील अंतर्गत मतभेद अशा अनेक गोष्टींमुळे राजकीय परिस्थिती सतत बदलत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात या सर्व राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीबद्दल आपले मत आणि भूमिका केंद्रीय नेत्यांसमोर मांडली आहे.

